श्रीदत्तमहाराज करवीर नगरीत भिक्षा का मागतात?
विशेष म्हणजे, अश्विन पौर्णिमा आई अंबाबाईचा वार्षिक महाप्रसाद!
कोल्हापूर हे जसे देवी क्षेत्र म्हणून विख्यात आहे तसेच दत्त क्षेत्र म्हणून देखिल प्रसिध्द आहे. दत्तगुरूंच्या नित्यक्रमात श्रीक्षेत्र करवीर अर्थात कोल्हापूर हे महाराजांचे भिक्षा स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. वास्तविक दत्तगुरु म्हणजे साक्षात परब्रह्म!
अष्टमहासिद्धी त्यांची नित्य सेवा करतात. अशा परिस्थितीमध्ये हातात सुवर्णपात्र घेऊन भिक्षा मागण्याची ही लीला दत्तगुरु का करतात?
याचे उत्तर त्यांच्या चरित्रात आहे कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवताना, कंडणी, पेषणी, मार्जनी, चुल्ली आणि उदकुंभी ही पाच प्रकारची पातके होत असतात.
यांना पंचसुना असे म्हटले जाते, धान्य कांडतेवेळी दळतेवेळी ,भांडी घासतेवेळी किंवा धान्य मळतेवेळी, अन्न शिजवितेवेळी, पाणी भरतेवेळी., अशा पाच प्रकारच्या कृतींवेळी जी जीव हिंसा घडते त्या हिंसेशिवाय अन्न शिजवणे कठीण असते. परंतु, अशा अन्नाला जे पाप लागते त्यातून मुक्त होण्यासाठी, यती म्हणजे संन्यासी आणि ब्रह्मचारी या दोघांना, तसेच अतिथीला अन्नदान केल्यावर, वैश्वदेव व इतर देवताकृत्ये करून अन्नग्रहण केल्यावरच या पापाची निवृत्ती होते.
करवीरातल्या जनांना हे पाप लागू नये म्हणून, आपले आजोळ असलेल्या या क्षेत्रामध्ये दत्तप्रभू नित्य भिक्षेला येतात.
कोल्हापूरचे ग्रामदैवत असणारे भगवान कपिलेश्वर हे दत्तगुरूंचे मामा!
तर, कपिलेश्वरांचे स्थान आणि अनसूया मातेचे माता-पिता, अर्थात कर्दम आणि देवहुती यांचे स्थान सुद्धा कोल्हापुरात वांगी बोळामध्ये आहे. थोडक्यात, अनसूया मातेचे माहेर म्हणजे हे करवीर!
आणि अशा या आजोळघरामध्ये नित्य वास्तव्य करणाऱ्या जीवांना कोणत्याही प्रकारचे पातक लागू नये म्हणून दत्तगुरु नित्य या क्षेत्री भिक्षेला येतात. नगरामध्ये भिक्षा मागून झाल्यानंतर नगराच्या बाहेर असलेल्या जयंती नदीच्या तीराच्या थोडं अलीकडे, म्हणजे एकविरा मातेच्या मंदिरामागे दत्तगुरु विसावा घेतात व भिक्षा ग्रहण करतात., अशी समजूत आहे.
याला पुष्टी देणारे दत्त भिक्षालिंग मंदिर आजही बिंदू चौकाच्या पुढे, आझाद चौक परिसरात, कॉमर्स कॉलेजच्या शेजारी आहे. जिथे पूर्वाभिमुख एकविरेच्या पाठीमागे आयताकृती गाभाऱ्यात उत्तराभिमुख असे, त्र्यंबकेश्वराप्रमाणेच तीन लिंगं असणारे दत्तगुरूंचे भिक्षालिंग स्थान आहे.
रोज दुपारी माध्यान्ह आरतीच्या वेळेला इथे असंख्य भाविकांची गर्दी असते. दर गुरुवारी व पौर्णिमेला तिथे पालखी सोहळाही संपन्न होतो.
दत्त महाराजांच्या शाश्वत अस्तित्वाची प्रचिती आजही तिथे अनेकांना येते.
श्री मातृ चरणारविंदस्य दासः प्रसन्न सशक्तिकः
या देवी सर्व भूतेषु मातृरुपेण संस्थितां ।
