अधिकमास माहात्म्य
अध्याय २४
दानांचे माहात्म्य
पार्वतीचे मातेसाठी व्रत
लक्ष्मी म्हणाली - "नाथ, आपण मला विप्रसेवेचा महिमा सांगितलात. अधिकमासात कोणती दाने दिली तर कोणते फल मिळते ते मला जाणून घ्यायचे आहे. लोकांचे हित व्हावे म्हणून हे ज्ञान आपण प्रकट करावे अशी माझी विनंती आहे." तेव्हा विष्णू म्हणाला - "प्रिये, तू चांगला प्रश्न केलास. मी प्रत्येक वस्तूच्या दानाचे फळ सांगतो. जो अधिकमासात सत्पात्र ब्राह्मणाला यथाशक्ती सुवर्ण दान देतात त्यांना कधी दारिद्रय येत नाही. त्यांचे इष्ट कार्य यशस्वी होते. देवता व अग्नी त्यांना प्रसन्न होतात आणि गाय दान देणाऱ्याची सर्व पापे नाहीशी होतात व तो चिरकाल सत्यलोकात राहतो. जो भक्तिभावाने ब्राह्मणास थोडे जरी रूपे देतो त्याचे पितर संतुष्ट होतात व त्याच्या कामात यश देतात. जो तांब्याचे भांडे सत्पात्र माणसाला दान देतो त्यावर शंकर व पार्वती प्रसन्न होऊन सदासर्वदा सहाय्य करण्यास तत्पर असतात. रत्ने दान दिल्यास मनुष्य चक्रवर्ती राजा होतो आणि मोत्यांचे दान देणारा उत्तम सुख भोगून मोक्ष प्राप्त करतो. कांबळे दान दिले तर पाप नष्ट होते.
वस्त्रे दान दिल्याने चंद्रलोकांत स्थान मिळते. लोकरीची वस्त्रे दिली तर भय नाहीसे असे होते. ज्या काळी, ज्या व्यक्तीला उचित प्रसंगी योग्य उपयोगी वस्त्रादिक दान दिले तर देणाऱ्याला मरणोत्तर उत्तम गती प्राप्त होते. विप्रांना उत्तम धान्य द्यावे त्यामुळे मी संतुष्ट होतो. त्यामुळे दात्याचे सर्व संकल्प सिद्धीस जातात. भुकेलेल्या माणसाला अन्न व तृषार्ताला पेय जल दिले तर जे पुण्य मिळते ते अक्षय असते. जोडे दान दिले तर दात्याच्या यमयातना चुकतात व तो थेट स्वर्गात जातो. तूप भरलेले पात्र दान दिले तर दात्याला सूर्यलोक प्राप्त होतो व तीळ दान दिले तर रुद्रलोकात स्थान मिळते. वर्षभर पुरेल इतके धान्य, वस्त्रे, दागिने, तूप, तेल इत्यादींसह घेऊन माझी व शंकराची पूजा करावी. मग अधिकमासात द्वादशीच्या दिवशी ब्राह्मण व त्याची पत्नी यांची पूजा करावी व त्या सर्व वस्तू त्या मेहुणाला दान द्याव्यात. ते दान अप्रतिम आहे. तसेच त्याचे फलही फार श्रेष्ठ आहे. दात्याला सर्वत्र यश मिळेल. घृतदानही फार फलदायी आहे. घृत ब्राह्मणाला द्यावे. सप्त धान्यांचे यथाशक्ती दान द्यावे. सप्तर्षी लोकात स्थान मिळते. तीन जातींच्या तिळाचे दान या मासात रोज अल्प प्रमाणात ब्राह्मणांना द्यावे. त्याने मी व इतर सर्व देव प्रसन्न होतो. थोडे सोने व तीळ दान दिले तर अष्टसिद्धी प्राप्त होतात. तूप, वेलची, साखरेचा पाक यांसह तिळाचे लाडू करून ते मुलांना व आप्तजनांना द्यावेत. त्यामुळे गोलोकातील श्रीकृष्ण प्रसन्न होतो. तुपात तळलेले मोदक जो अधिकमासात ब्राह्मणांना दान देतो त्याची सर्व कार्ये सिद्धीस जातात. सर्व पुण्यप्रद कर्मात दान हे सर्वांत श्रेष्ठ पुण्यकर्म आहे. अधिकमासात तर दानाचे पुण्य फार असते.
स्नान, दीपापर्ण, गोपूजन, विप्रपूजा, विविध दाने, जप, होम, तीर्थदर्शन, पुरुषोत्तमाची पूजा या सर्व पुण्यकर्मांना अधिकमासाच्या जास्त सामर्थ्य प्राप्त होते. सर्व पापे नाश पावतात. उत्तम गती प्राप्त होते. वैकुंठात स्थान मिळते. अधिकमास व्रताचा महिमा तर अद्वितीय आहे. सर्व यज्ञयाग, तीर्थस्थाने, जप, तप, सर्व इतर व्रते यांपेक्षा अधिकमास व्रत जास्त प्रभावी आहे." विष्णू असे सांगत होता तेव्हा लक्ष्मीने त्या व्रताची माहिती विचारली. विष्णू म्हणाला - " या विषयी मी एक इतिहास सांगतो. एकदा अरुंधती व पार्वती बोलत बसल्या होत्या. अरुंधती पार्वतीला म्हणाली - " तू मला अनेक व्रतांची माहिती सांगितलीस. अधिकमासात कोणते व्रत करावे ते मला सांग." तेव्हा पार्वती म्हणाली - " हे साध्वी अरुंधती, अधिकमास व्रताची माहिती मी तुला सांगते." ऐक. एकदा माझे पती कैलासनाथ यांच्यासह मी आनंदात बसले होते तेव्हा माझी माता मेनका मला म्हणाली - ' हे उमे, तू माझी मुलगी. पण माझ्यापेक्षा त्रिभुववनात तुझीच ख्याती जास्त आहे. माझी तुझ्यावर प्रीती आहे. पण तुझ्या कीर्तीचा मला काहीच लाभ झाला नाही. तू सर्व तिन्ही लोकात प्रसिद्ध आहेस पण माझे नाव फक्त माझ्या घरापुरतेच आहे. ब्रह्मदेवासकट सर्व देव तुझी स्तुती करतात. मी जरी मानाने मोठी असले व उच्च स्थानी रहात असले तरी कोणी माझ्याशी बोलत सुद्धा नाहीत. वर्षभर कितीतरी दिवस तुझ्यासाठीच्या व्रतानी व्यापलेले आहेत.
व्रती सज्जन नेहमी तुझीच पूजा करतात. माझ्या मस्तकावर कोणीही एकही फुल वाहत नाहीत. मी तुझी असून काय उपयोग ? माझ्यासाठी एकही व्रत, एकही घटका व्रत कोणी करीत नाही. माझे मंद भाग्य, दुसरे काय ?' पार्वती म्हणाली - " हे अरुंधती ! आईचे हे बोलणे ऐकून मी स्मित हास्य करून तिला म्हणाले - 'आई ! जरी वर्षभर माझ्या पूजेत लोक रमतात तरी अधिकमासात कोणीही मला मान देत नाहीत. मीच आता अधिक महिन्यात तुझ्या प्रित्यर्थ व्रत करीन व तुझी पूजा करीन.' असे म्हणून मी नंतर येणाऱ्या अधिक महिन्यात व्रत धारण करून माझ्या आईची, मेनकेची पूजा केली." अरुंधती म्हणाली - " हे पार्वती, ते व्रत कसे केलेस ते मला सांग. अधिक मास फार महत्त्वाचा आहे. तो रिकामा जाऊ नये." त्यावर पार्वती म्हणाली - "साध्वी ! तू चांगली विनंती केलीस. मी जे व्रत केले व माझ्या मातेला ते व्रत कसे अर्पण केले ते सांगते.
अधिकमासात शुक्ल तृतीयेस सुचिर्भूत होऊन, शुक्ल वस्त्र नेसावे. गुरुची आज्ञा घ्यावी. शुद्ध स्थळी, सुशोभित जागा करून पळसाच्या पाटावर धोत्र्यांची पाच फळे स्थापावी व देवता स्थापावी. मेनादेवीची, हत्तीवर आरुढ अशी मेणाची मूर्ती करावी. पती हिमालय व मैनाक हा पुत्र तिच्या बरोबर आहे अशी ती मूर्ती असावी. पाच गौरींसह ती मूर्ती त्या पळसाच्या पाटावर स्थापावी. हे कार्य समंत्रक व यथाविधी करावी. सर्व सोळा उपचार अर्पण करून तिची पूजा करावी. उत्तम मार्गाने प्राप्त झालेले नाना उत्तम पदार्थ अर्पण करावे. मासभर चोवीस तास रोज अखंड दीप तेथे तेवत ठेवावा. रोज याप्रमाणे महिनाभर मेनादेवीची पूजा करावी. रोज एकदाच जेवावे. जर तसे सामर्थ्य नसेल तर तृतीयेच्या दिवशी व अमावस्येला तर एकभुक्त असावे, तरीही व्रतकर्ती अशक्त असल्यास पूर्ण एकभुक्त राहिल्याचे पुण्य मिळते. शेवटी उद्यापन करावे. मेनेची सोन्याची प्रतिमा पुजून ब्राह्मणासही सर्वोपचारानी पुजून ती मूर्ती यथाविधी त्याला अर्पण करावी.
पाच ब्राह्मणांना वस्त्रप्रावरणे, आभूषणे व पूजनपूर्वक भोजन द्यावे व नातलगांपैकी मेहुण बोलावून त्यांनाही सन्मानपूर्वक भोजन द्यावे. जे या व्रताचे पालन करतील त्यांना सुख, सौभाग्य व संतती प्राप्त होतील. हे व्रत मला आवडते म्हणून काळजीपूर्वक व श्रद्धापूर्वक आचरणात आणावे." गौरीने अरुंधतीला हे व्रत सांगितले. तेव्हा मी, हे इंदिरे, तुला सांगितले." विष्णूने लक्ष्मीला आणखी कथा सांगण्यास सुरुवात केली. ती पुढच्या अध्यायात वाचावी.
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-२४ समाप्त ||