🌷 श्रीरामदत्त 🌷
अधिकमास माहात्म्य
अध्याय १
अधिक मास माहात्म्याचा पहिला अध्याय स्वरूपात दिला आहे. पद्मपुराणातील श्री विष्णू-लक्ष्मी कृपेची ही पवित्र कथा भक्तांसाठी अत्यंत मंगल मानली जाते.
नारायण-नारद संवाद. श्रीकृष्ण व पांडव यांची भेट
श्रीगणेशाला नमस्कार. श्री सरस्वतीला नमस्कार. श्री गुरु चरणांना नमस्कार. " हे गणनायका, गजवदना, विघ्नहारका, मंगलमूर्ते, शुभकारका, सुख देणाऱ्या दयाघना ! तू सर्वेश्वर आहेस. तुझे कोणतेही मनोरथ अपूर्ण राहिलेले नसतात. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा तू कल्पतरू आहेस. कोणत्याही कार्यारंभी तुला नमस्कार केल्यास ते कार्य तू पूर्णतेस नेतोस. अशी तुझी कीर्ती वेद, स्मृतिग्रंथ आणि पुराणे यात गायलेली आहे. म्हणून हे गणपती, मी तुला आरंभी वंदन करीत आहे. हे दयाळा कृपा कर. सर्व विघ्नांचे समुदाय परतवून लाव. उत्तम काव्य करण्यास बुद्धी देऊन माझी कामना पूर्ण कर."
अशा प्रकारे मी गणपतीची प्रार्थना करून आता सरस्वतीला मी नमन करतो. ती कवीच्या जिभेवर वास करते व त्याच्याकडून रसाळ ग्रंथरचना करून घेते. आता मी परम आनंदरुपी अमृताचा सागर अशा सद्गुरुला नमस्कार करतो. त्या गुरूच्या कृपाकटाक्षाने नर भवसागराच्या पलीकडे जाऊ शकतो. आता कृपासागर असे माझे कुलस्वामी श्रीधूतपापेश्वर आणि आर्यादुर्गा ही कुलस्वामिनी यांना मी वंदन करतो. पूर्वी ज्यांनी उत्तम सोज्वळ ग्रंथ निर्माण केले त्या शुद्ध चित्ताच्या महाकवींना तसेच आई-वडील इत्यादी ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करतो.
हे पुरुषोत्तमा, हे पुराणपुरुषा, हे पूर्णकामा, हे आत्मारामा, योगी लोकांच्या मानाचे तूच विश्रामस्थान आहेस. हे स्वामी तू अजन्मा आहेस. तू कधीही पतन पावत नाहीस म्हणून तू अच्युत आहेस. तुला कुठलीही उपाधी नाही. असंख्य ब्रम्हांडाचा तू नायक आहेस. तू जग निर्माण करतोस. त्याचे पोषण करतोस व त्याचा अंतही करतोस. जगाला तू व्यापून असतोस आणि त्या जगाचा तू गुरुही आहेस. सर्व देवांचा तू देव आहेस. तू अनंत आहेस. आणि कला, काष्ठा, पल, विपल इत्यादी प्रकारे मोजला जाणारा जो काळ त्याचा तू आत्मा आहेस.
जे तुला शरण येतात त्यांना यम कोणताही त्रास देऊ शकत नाही. तू सर्वांपलीकडचे परब्रम्ह आहेस. तू वेद व शास्त्रे यांना कळत नाहीस. तू अपार आहेस. तू तिन्ही गुणांच्या पलीकडचा असून अक्षर असा सच्चिदानंद आहेस. काय सांगू? तुझी कृपा झाली तर आंधळा पाहू शकतो. पांगळा पर्वत ओलांडू शकतो आणि मुक्या माणसाला वाचस्पती सारखे बोलता येते. तू गुणांचा अपार सागर आहेस. त्याची सीमा कुणासही कळत नाही. तरी मी तुझे वंदन करण्यास धजावलो ही माझी धिटाईच आहे.
हे देवा, तुझ्याच सामर्थ्याने, तुझ्याच कृपेने, तुझ्याच समोर तुझे वर्णन करू लागलो तर मला काय कमी पडणार? सर्व सत्ता तुझ्या कृपेचीच आहे. हे ऋषिकेश, जे तुला सर्वस्वी शरण येतात व वंदन करतात, त्यांना तू प्रसन्न होतोस व उत्तम बुद्धी देतोस. असे संत म्हणतात म्हणून मी भक्तिभावाने तुला वंदन करतो व प्रार्थना करतो की माझ्याकडून ग्रंथरचना करून घे. असो.
श्रीमद व्यास महर्षींनी पद्मपुराणात व बृहन्नारदीय पुराणात अशी दोन अधिकमास माहात्म्यांची आख्याने संस्कृतमध्ये रचली आहेत. त्यातील सर्व अर्थ घेऊन मी सर्वांना समजेल अशा मराठी भाषेत यथामती वर्णन करीत आहे. त्यात काही अधिकउणे असेल तर संतश्रोते यांनी क्षमा करावी. कारण लहान बालक जरी बोबडे बोल बोलला तरी त्याच्या आई-वडिलांना संतोष होतो.
नैमिषारण्यात सूत, शौनक आदी ऋषींना नित्य नवनवीन पुराणकथा सांगत असे. एकदा सर्व ऋषी सूताला म्हणाले — "हे व्यास शिष्या, तुझे पुण्य थोर आहे. तू भाग्यवान आहेस. त्यांच्या कृपेने त्यांच्या वचनांचे रहस्य तू जाणतोस. म्हणून आम्ही मनापासून तुझी विनंती करीत आहोत. या अपार संसारात ऐकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. त्यातील जे अत्यंत श्रेयस्कर, सारभूत असेल, ज्यामुळे आम्हाला परमानंद होईल, जे आख्यान भवसागरातून पलीकडे जाण्यास साहाय्यक होईल, ते कृपा करून आम्हास सांगावे."
ऋषींची विनंती ऐकून सूत म्हणाला — "अहो महामुनीहो, मी संकर जातीचा आहे. तरी तुम्ही मला विनंती करता. त्यामुळे मी धन्य झालो. म्हणून व्यासांकडून मी जे श्रवण केले, तेच मी तुम्हाला नीटपणे माझ्या मतीप्रमाणे सांगतो. तेव्हा ते कृपा करून श्रवण करा."
कथा
एकदा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारदमुनी त्रैलोक्यात स्वेच्छेने फिरत असता, हिमालयाच्या जवळ असणाऱ्या बदरिका वनात आला. तेथे नारायणऋषीचा आश्रम होता. तेथे तपोवन होते. गगनचुंबी वृक्ष होते. घनदाट छाया होती. निबिड वृक्षातून सूर्यकिरण क्वचितच भूमीवर पडत होते. अनेक लताकुंजही ठिकठिकाणी शोभत होते. बोर, रातांबा, बेल, फणस, जांभूळ, आवळा असे अनेक वृक्ष तेथे होते. गंगेचा प्रवाह विष्णुपदाजवळूनच वाहत होता. पशुपक्षी परस्परांचे वैर विसरून सुखाने विहार करीत होते. तुळशीच्या बागा होत्या. फुलझाडे बहरलेली होती. जाई, जुई, मालती, कितीतरी वेली तेथे होत्या. त्यांच्या फुलांचा घमघमाट काय विचारता!
तपस्वी लोकांच्या पर्णकुट्या गंगातीरावर शोभत होत्या. ठिकठिकाणी योगी ध्यान लावून बसत होते. अनेक सिद्ध गण तसेच देवही तेथे आनंदाने येऊन रहात होते. अशा ठिकाणी नारदमुनी अकस्मात आला. तेथे महान तपस्वी जितेंद्रिय नारायण ऋषी ब्रह्मचिंतन करीत बसले होते. त्यांना नारदाने साष्टांग नमस्कार केला व हात जोडून उभा राहून नम्रपणे व गोड शब्दात बोलू लागला.
"हे नारायणा, तू निष्काम आहेस. तुला कर्माचे बंधन नाही. तू परमेश्वरच आहेस. वास्तविक तुला तप करण्याचे कारण नाही. पण लोकशिक्षणार्थ तू येथे तप करतोस व लोकांना मर्यादा घालून देतोस. ह्या असार संसारात सर्व लोक विषयासक्त आहेत. तरी त्यांचे कशाने कल्याण होईल व माझेही कल्याण होईल असे काहीतरी योग्य कार्य तू स्वतः मला सांगावेस, अशी माझी विनंती आहे. मी तुला शरण आलो आहे."
नारदाची विनंती ऐकून नारायणऋषीला आनंद झाला. तो कथा सांगू लागला. शंका आली की नारद प्रश्न विचारी व नारायणऋषी त्याचे समाधान करी. नारायणऋषी म्हणाला — "नारदा, पुरुषोत्तमाचा महिमा सर्वात मोठा आहे."
नारदाने विचारले — "पुरुषोत्तम हा कोणता देव आहे? नवीनच काहीतरी ऐकतो आहे. त्याची कथा सविस्तर सांगावी."
नारायणऋषी म्हणाले — "तुझा प्रश्न चांगला आहे. पुरुषोत्तम हे एका महिन्याचे नाव आहे. त्या महिन्याचा स्वामी पुरुषोत्तम आहे. म्हणून त्या महिन्याचे नावही पुरुषोत्तम असेच पडले आहे. त्या मासाचे व्रत योग्य प्रकारे आचरण केले तर पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो."
नारदाने विचारले — "प्रत्येक महिन्याला स्वामी असतो. पण त्या स्वामीमध्ये पुरुषोत्तमाचे नाव मी ऐकले नाही. हा कुठला महिना? आणि त्याचा स्वामी पुरुषोत्तम कसा? त्या महिन्याचे स्वरूप काय? त्या महिन्यात कोणती कृत्ये करावी? जप कोणता करावा? दाने कोणती द्यावी? तसेच त्याचे अद्भुत फळ काय मिळते? कोणता देव संतुष्ट होतो?"
नारायणऋषी म्हणाले — "तू उत्तम प्रश्न केला आहेस. तरी मी श्रीकृष्णाने युधिष्ठिरला जे व्रत सांगितले होते तेच तुला सांगतो. ऐक."
दुर्योधन व इतर कौरव यांनी द्यूतात युधिष्ठिराला फसविले. सर्वस्व हिरावून घेतले. शेवटी द्रौपदीही पणाला लावली व युधिष्ठिर हरला. दुःशासनाने द्रौपदीची विटंबना केली. पांडवांची निर्भस्तना केली. सर्व खाली माना घालून बसले. कृष्णाने गुप्तपणे तिचे रक्षण केले.
पुन्हा पांडव द्यूतात हरले व त्यांच्या नशिबी वनवास आला. पाचही पांडव व द्रौपदी काम्यक वनात वनवासी लोकांप्रमाणे राहू लागले. वल्कले नेसले. कंदमुळे खाल्ली. पाण्यासाठी कमंडलू वापरले. साध्या वस्त्रात भूमीवर झोपले. ते अनेक दुःखे भोगत होते.
त्यांना भेटायला एकदा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण काम्यक वनात आला. अत्यंत प्रेमाने पांडवांनी त्याचे स्वागत केले. द्रौपदी रडू लागली. पांडवांची दैन्यवस्था पाहून व द्रौपदी कृश झालेली पाहून श्रीकृष्णाचे हृदय द्रवले.
कृष्णाच्या अंगात क्रोध संचारला. त्याचे रूप भयानक झाले. त्याचक्षणी त्याने कौरवांचा नाश करायचे ठरविले. पांडव घाबरले. पण अर्जुनाने अतिशय नम्रपणे गोड बोलून श्रीकृष्णाचा राग कमी केला. त्याच्या युक्तिवादाने व शरणागतीने श्रीकृष्ण पुन्हा शांत झाला. तेव्हा पांडवांच्या जीवात जीव आला.
कृष्णाला फलमुलादीक समर्पण करून व बरोबरच्या मुनींनाही योग्य प्रकारे पूजन करून संतुष्ट केले. नंतर श्रीकृष्णाजवळ संवाद करताना पांडवांना श्रीकृष्ण म्हणाला — "मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे."
॥ अधिकमास माहात्म्य अध्याय – १ समाप्त ॥
॥ इति प्रथमोध्यायः ॥
