अधिकमास माहात्म्य
अध्याय ८
सुदेव पुत्र निधन, सुदेव - नारायण संवाद, अधिकमासाचा प्रभाव
वाल्मिकी दृढधन्वा राजाला सांगू लागले - गौतमीने जे सांत्वन केले त्यामुळे सुदेवाचे मन थोडेसे ताळ्यावर आले. आता जे अटळ आहे त्याला तोंड दिलेच पाहिजे असा विचार करून सुदेव हरिचिंतन करीत व शुकदेवाचे पालन पोषण करीत काळ घालवू लागला.
काही महिने गेले. मुलाला बारा वर्षे होत होती. सुदेव दर्भ व समिधा आणण्यासाठी वनात गेला होता. दिवस उन्हाळ्याचे होते. शुकदेवाने आपले मित्र जमविले व एका विशाल विहिरीत ते मुलगे पोहण्यासाठी उतरले व पाण्यात पकडापकडीचा खेळ खेळू लागले. कोणी मुलगा पाण्याच्या आत जाई व पोहणाऱ्या मित्रास खाली ओढी. शुकदेव पोहता पोहता अचानक त्याची गात्रे शिथिल पडली व तो तळाशी गेला. तेथे पाणी पोटात शिरून व फुफ्फुसात शिरून तो गतप्राण झाला.
पुष्कळ वेळ गेला तरी मित्रांना तो कुठेच दिसेना. मुले घाबरली. गौतमीकडे ती आक्रोश करीत धावत आली – “अहो आई! तुमचा मुलगा विहिरीत बुडाला, धावा!” गौतमीला मूर्च्छाच आली.
तेवढ्यात समिधा व दर्भ घेऊन सुदेव ब्राह्मण घरी आला. घरात रडारड! पुत्र बुडाल्याची बातमी कळताच मूर्च्छा येऊन तोही पडला. जरा वेळाने तो शुद्धीवर आला. पतीपत्नी विहिरीकडे धावली. मुलाचा मृतदेह फुगून पाण्यावर तरंगत होता.
तो वर काढून मांडीवर घेऊन सुदेव आक्रोश करीत राहिला. नाना आठवणी काढून व पुत्रशोक झालेल्या दशरथ आदि पूर्वकाळच्या लोकांच्या स्थितीचे स्मरण करीत अनेक प्रकारे दारुण आक्रोश करू लागला. तो विष्णूचा आर्ततेने धावा करू लागला.
अचानक बोचरे वारे वाहू लागले. काळेकुट्ट मेघ चारी दिशांनी आकाशमध्यावर येऊन जोराचा पाऊस पडू लागला. पाऊस पडत आहे, आपण भिजत आहोत याचे भानही सुदेव ब्राह्मणाला नव्हते. तो पाऊस महिनाभर पडतच राहिला.
मुलाच्या प्रेताजवळ बसलेल्या सुदेवाने महिनाभर अन्नपाण्याविना उपास काढला व सतत स्नानही त्याला घडले. त्यावेळी अधिक महिना होता. नकळत त्याचे तपाचरण घडले होते.
भगवान विष्णू त्याच्यासमोर प्रगट झाला. त्याचे दर्शन होताच सुदेवाचे सर्व श्रम व ग्लानी नाहीशी झाली. विष्णू म्हणाला – “हा तुझा पुत्र मी जिवंत करतो. याला बारा हजार वर्षे आयुष्य लाभेल. त्याचे दर्शन घडावे म्हणून देवही आशा धरतील.
गरुडाच्या आशीर्वादाने प्राप्त झालेला हा तुझा शुकदेव तुला नित्य सुखच देईल. तू गृहस्थाश्रमाचे सुख दीर्घकाळ भोगशील व मग ब्रह्मदेवाच्या लोकांत निवास करशील. तेथून तू पृथ्वीवर राजा म्हणून जन्माला येशील. तुझे नाव दृढधन्वा व गौतमी तुझी तेव्हाही पत्नी म्हणून येईल.
तिचे नाव गुणसुंदरी असेल. शुकदेव हा पोपट म्हणून येईल व अरण्यात वृक्षावर बसेल. ऐहिक सुखभोग भोगणाऱ्या तुला सावध करून परमार्थ मार्गाचा अवलंब करण्याची प्रेरणा देईल. तुझी शंका वाल्मिकी ऋषी येऊन दूर करतील.”
त्यावेळी सुदेवाचा पुत्र जिवंत होऊन उठला. सर्वत्र आनंदीआनंद झाला. नतमस्तक होऊन सुदेवाने विष्णूची स्तुती केली.
पुष्कळ तप केले तरी नशिबात पुत्र नव्हता म्हणून विष्णुने त्याला सांगितले. गरुडच्या वरदानाने पुत्र झाला. तो बाराव्या वर्षी मेला आणि केवळ अधिकमासात स्नान व उपोषण घडल्यामुळे पुन्हा जिवंत झाला.
या सर्व घटनांमुळे त्याचे मन गोंधळून गेले होते. “स्पष्टीकरण व कार्यकारणभाव काय?” असा प्रश्न राजाने प्रत्यक्ष विष्णुलाच विचारला. वाल्मिकी सुदेव ब्राह्मणाची कथा सांगता सांगता थांबले.
