अधिकमास माहात्म्य
अध्याय १५
उग्रदेवाकडून मणिग्रीवास उपदेश
मणिग्रीव व त्याची पत्नी उग्रदेवाचे म्हणणे ऐकू लागली. त्याने विचारल्यावरून मणिग्रीव आपली कथा सांगू लागला. मणिग्रीव म्हणाला - " चमत्कार नावाच्या जवळच्याच गावात मी रहात होतो. मी धनिक व उदार होतो. परोपकारी होतो. पण ग्रहयोगाने माझी बुद्धी फिरली. मी अनीतीने वागू लागलो. स्वैराचार, दुराचार करू लागलो. सर्व व्यसने करू लागलो. व्यभिचार केले, वित्तशाठ्य करून अनेकांना फसविले. कित्येक खून केले. लोकांनी मला वाळीत टाकले. राजाने मला दंड केला. माझी सर्व संपत्ती जप्त केली आणि नगराच्या बाहेर तडीपार केले.
पण ही माझी पत्नी सर्व हालात सतत मजसंगे राहिली व माझ्याशी एकनिष्ठ राहून माझी तिने सेवा केली. मी फार पापी आहे. फार दुःखी आहे. तुम्ही माझ्यावर दया करा. माझे दारिद्र्य दूर होईल व मला पुन्हा सदबुद्धी मिळेल यासाठी काहीतरी उपाय सांगा."
उग्रदेव म्हणाला - " तू एवढी पापे केलीस पण तुझ्या मूळ परोपकारी स्वभावाप्रमाणे मला पाणी दिलेस, विश्रांती दिलीस, मला जीवदान दिलेस. ही तुझी सुप्त सदबुद्धीच होय. सदभाग्य आता उदयास येईल यात काही शंका नको. आता लवकरच अधिकमास येत आहे. त्या महिन्यात काही व्रते केली तर फार मोठे पुण्य लाभते. या लोकी सुख मिळते. स्वर्गातही सुख लाभते. वैकुंठप्राप्तीही होते. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने असे वचन दिले आहे.
अधिकमास हा पुण्यकृत्यांसाठी सर्वस्वी श्रेष्ठ महिना आहे. तुम्ही त्या मासात श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे अखंडपणे तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. त्यात तिळाचे तेल व सात धागे असणारी वात घालावी. दिव्यास तूप किंवा उंडीचे तेल सुद्धा चालेल. रोज तुम्ही दोघांनी श्रीकृष्ण स्मरणपूर्वक नदीत स्नान करावे. पुरुषोत्तम देवाची पूजा करावी. नैवेद्य दाखवावा. दिवा रात्रंदिवस तेवत ठेवावा.
तुम्हाला वेद म्हणण्याचा अधिकार नाही. पण सर्व उपासनांपेक्षा अधिकमासात करावयाचे हे व्रत फार प्रभावी आहे. तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील." असे सांगून उग्रदेवाने व्रताची सर्व माहिती मणिग्रीवाला सांगितली व तो म्हणाला - " तुमचे कल्याण होवो व या व्रताने तुम्हाला सर्व सुखे मिळोत. तुम्ही माझी सेवा केलीत त्यामुळे प्रसन्न होऊन मी तुम्हाला सुखाचा मार्ग सांगितला."
असे सांगून व त्या दोघांचा निरोप घेऊन उग्रदेव प्रयाग क्षेत्राकडे गेला. दोन महिन्यांनी अधिकमास आला तेव्हा मणिग्रीवाने अत्यंत भक्तिभावाने स्नान, देवपूजा, सतत दीप तेवत ठेवणे हे सर्व यथाविधी केले. त्यामुळे त्याची बुद्धी पवित्र झाली. परोपकार करणे व औदार्याने दाने देणे या सर्व गोष्टी तो वनात राहूनही करू लागला. हिंसकता व अनीती प्रवृत्ती नाहीशी झाली. मन शुद्ध व शांत झाले.
अगस्त्य मुनी म्हणाले - "हे चित्रबाहो ! तूच तो मणिग्रीव व चंद्रकला ही तुझी पत्नी होती. त्यावेळी तू अधिकमासाचे व्रत केल्यामुळे तुम्हाला राजवैभव प्राप्त झाले आहे. विशेषतः श्रीकृष्ण मूर्तीसमोर अखंड दीप प्रदीप्त करून ठेवण्याचे हे फल आहे."
असे सांगून राजाचा निरोप घेऊन संतुष्ट मनाने अगस्त्य तेथून रवाना झाले. चित्रबाहुने उर्वरित आयुष्यात सत्कर्मेच केली व पत्नीसह त्याला वैकुंठात सायुज्य मुक्ती मिळाली.
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-१५ समाप्त ||
