॥ अधिकमास माहात्म्य ॥
अध्याय १६ – श्रीकृष्णभक्ती, नामस्मरण आदींचे पुण्य
लक्ष्मीने विष्णूला विचारले – "नाथ, काही लोकांना स्नान, उपोषणे इत्यादी कृत्ये करण्याचीही शक्ती नसते. तरीही त्यांना तेवढे फळ कोणत्या उपायाने मिळेल? कृपा करून जनकल्याणार्थ तुम्ही मला तो उपाय सांगावा."
त्यावर विष्णू म्हणाला – "तू रास्त प्रश्न विचारलास. मला आनंद झाला. हे पहा, ज्यांना नदीवर स्नान करणे, श्रीकृष्णाची मोठ्या प्रमाणावर पूजा करणे शक्य नसते त्यांनी हरीचे नाम सतत घ्यावे. त्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
कलियुगामध्ये हरी हरी, कृष्ण कृष्ण, असे नाम घेणे फार पुण्यदायक आहे. दहा हजार यज्ञांचे किंवा कोट्यावधी तीर्थस्नानांचे जे पुण्य असते तेवढे पुण्य हरिनामाने मिळते. पुरुषोत्तम मासात तर त्याला विशेष महत्त्व आहे.
हरीकिर्तन श्रवणाचे पुण्यही महान आहे. जे कृष्णनामाची अवहेलना करतात त्यांना फार दुःख होते. हरीभक्तीची गोडी बालपणापासूनच लागावी. नीच योनीत जन्मलेल्या माणसांना देखील हरिनामाचा अधिकार आहे. तेही पवित्रच म्हणावे.
हरिभक्त ज्या देशात राहतो तो देश वाईट असला तरी त्याच्यामुळे पवित्र मानला जातो. ह्या कलियुगात अल्पशा नामस्मरणाने, संतसंगाने व हरिकीर्तनाने जे फळ एका दिवसात मिळते त्यासाठी सत्य आदि तीन युगात दीर्घकाल तप करावे लागत असे.
अनेक प्रकारची पापे केलेले लोक हरिभजन करू लागले तर पापमुक्त होतात. इंदिरे! या कलियुगात अन्य खडतर तपांचा तेवढा उपयोग नाही जेवढा हरिनाम जपाचा होतो.
ज्यांना जास्त सामर्थ्य नाही त्यांनी हरिनाम घ्यावे व अधिकमासाची सर्व व्रते केल्याचे पुण्य मिळवावे. केवळ हरिभक्तीने मनुष्य परमगती प्राप्त करतो हे कलियुगाचे महत्त्व आहे. हरिनामाने सर्व तप पूर्ण होतो.
इंदिरे! दुसरे असे की मी व शिव यांत भेद नाही. कोणाचेही नाम घेतले तरी फळ सारखेच असते."
"कमले! अन्नदानाचे पुण्यही फार आहे. एरव्ही सुद्धा अन्न हेच प्राणसंजीवन असल्यामुळे अन्नाने लोकांची भूक भागविणे फार पुण्यकारक आहे.
अधिकमासात नियम करून रोज अन्नदान करावे. तसेच अधिकमासात जे उपवास करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होतात.
संपूर्ण महिना रोज उपवासाचे पदार्थच खाणे हा पुर्नोपवास, एक दिवसाआड उपवास करणे, एक पक्षभर उपवास करणे, तीन दिवस उपवास करून चतुर्थ दिनी पारणा करणे, रोज एकदाच भोजन करणे, रोज एकच पदार्थ भक्षण करणे असे यथाशक्ती उपवास करावे.
स्त्री, पुरुष, बाल, तरुण, वृद्ध कोणीही अधिकमासात एक दिवस तरी ईश्वर कृपेसाठी उपवास करावा. विधवांनी उपवास करणे त्यांना पुढील जन्मी सौभाग्यदायक आहे. यासंबंधी एक कथा ऐक."
पूर्वी नर्मदातीरी माहिष्मती नगरात तापसी नावाची एक स्त्री राहत असे. ती नेहमी नानाविध तपे करी. उपास करी, जप करी, सदाचार करी. अधिकमासात तर नित्य ठराविक उपवास करण्यास चुकत नसे.
तिच्या घरी मोलकरीण म्हणून एक शूद्र स्त्री काम करीत असे. यदृच्छया तिला कुष्ठरोग झाला व ती मरण्याच्या पंथास लागली.
ती तापसीला म्हणाली – "मी तर आता लवकरच मरणार! पण दुर्दैवाची गोष्ट अशी की मी आजपर्यंत आयुष्यात काहीच पुण्य केले नाही. तू पुष्कळ व्रते केली आहेस. त्यातील थोडेसे पुण्य तू मला देशील का?
त्यामुळे मला सुख मिळेल व मी संसारसागर ओलांडून पुढे जाईन. तू मला मैत्रिणीसारखी वागवतेस. मला सर्वस्वी तुझाच आधार आहे."
तापसीला त्या स्त्रीची दया आली. तिने संकल्पपूर्वक अधिकमासात केलेल्या एका दिवसाच्या उपवासाचे फल तिला दिले.
त्याक्षणी त्या शूद्र स्त्रीचा रोग नाहीसा झाला. आकाशातून एक दिव्य विमान आले व ती दिव्य देहाने त्या विमानातून कैलासास गेली.
तेथे दिव्य भोग भोगून ती चंद्रेश्वरी देवतेचा जन्म घेऊन काशी येथे निवासास आली. चंद्रेश्वरीचे मंदिर काशीत आहे व तिची नित्य पूजा होत असते.
विष्णू म्हणाला – "अधिकमासात फक्त एक दिवस उपवास केला त्याचे फल एवढे मिळाले. हे इंदिरे! म्हणूनच सुज्ञ माणसांनी अधिकमासात उपोषण करावे."
त्यावर लक्ष्मीने त्याला आणखी काही प्रश्न विचारले. ते पुढील अध्यायात दिले आहेत.
॥ अधिकमास माहात्म्य अध्याय-१६ समाप्त ॥
