अधिकमास माहात्म्य अध्याय २७
विष्णू लक्ष्मीला अधिकमासातील नियमांची माहिती देतो
विष्णू म्हणाला - " असे हे पुरुषोत्तम पूजेचे व्रत महिनाभर केल्याने उत्तम फल मिळते हे खरे पण ज्यांना एवढे सर्व करणे शक्य नसेल त्यांनी काय करावे ते सांगतो. अधिकमासात मी रोज किंवा ठराविक दिवशी अमुक एक करीन असा संकल्प करावा. त्यानुसार काय काय करता येईल ते ऐक.
रोज अभ्यंग स्नान करणे, रोज एक वस्तू दान देणे, रोज हरिनामाचा ठराविक संख्येत जप करणे, रोज पितरांना तर्पण करणे, रोज सूर्याला सकाळी जल अर्पण करणे, रोज अमुक ग्रंथाचा विवक्षित भाग वाचणे किंवा पुराण- वाचकाकडून वाचन करवून ते ऐकणे, तेलकट पदार्थ वर्ज्य करणे, देवांची/कृष्णाची पूजा करणे, भूमीवर चटईवर झोपणे, एकच अन्नपदार्थाचे जेवण करणे, पत्रावळीवरच जेवणे (धातूचे ताट न घेणे), केळीच्या पानावरच जेवणे, एकदाच जेवणे, दिवसा उपासाचे पदार्थ खाणे, रात्रीच्या पहिल्या प्रहरात हविष्यान्न जेवणे, नखे, केस न काढणे, रोज देवापुढे अखंड तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून ठेवणे - योग्य व्यक्तीला निरांजन किंवा समई एका दिवशी सन्मानपूर्वक दान देणे, आवळी वृक्षाखाली स्नान करणे, नदीवर स्नान करणे, फळे त्या महिनाभरात न खाणे, मीठ वर्ज्य करणे, तीळ, विडा, धान्य एके दिवशी एक पदार्थ दान देणे, सुवर्ण दान करणे, चांदीचे भांडे देणे, सौभाग्यवाण देणे, भागवताचा ग्रंथ दान देणे, उपासाचेच पदार्थ खाणे, न मागता जर कोणी दिले तर तेवढाच आहार घेणे, एकान्तर उपवास करणे, मौन पाळणे, तुलसी पूजन करणे, शाळीग्राम पूजा करणे, रोज श्रीकृष्ण मंदिरात जाणे, श्रीकृष्णनाम जप करणे, यापैकी एखादा नियम करावा व न चुकता महिनाभर तो पाळावा. मांसाहार कोणत्याही प्रकारचा वर्ज्य करणे हा नियम मांसाहारी लोकांनी करण्यासारखा आहे. ब्रह्मचर्य पालन करणे, सत्य भाषण करणे, शल्यदुष्ट, भावदुष्ट, क्रियादुष्ट, शब्ददुष्ट, दृष्टीदुष्ट, करपलेले, दोनदा शिजवलेले, अति उग्र, शिळे, आंबवलेले, दुष्टस्पर्श झालेले अन्न खाऊ नये. (हा नियम एरव्हीही नित्य जीवनात पाळावा).
कावळा, कुत्रा, रजस्वला, दारुडा, घाणेरडा मनुष्य, पशु यांनी स्पर्शिलेले किंवा पाहिलेले अन्न खाऊ नये. ज्या ज्या पदार्थांना वर्ज्य करण्याचा नियम करील तो तो पदार्थ मासान्ती ब्राह्मणास सन्मानपूर्वक दान म्हणून द्यावा. तीच त्या नियमाची सांगता होय. नक्तभोजी व्यक्तीने शेवटी ब्राह्मणाला जेवायला घालावे. अयाचित अन्न खाणाऱ्याने सुवर्णदान करावे. फलत्यागी व्रतीने ते फळ ३० संख्येने शेवटी दान करावे. धात्रीस्नान करणाऱ्याने दूध किंवा दही दान करावे. तेल वर्ज्य केले असेल तर तूप दान द्यावे. तूप वर्ज्य केले असेल तर दूध दान द्यावे. धान्याचा नियम केल्यास गहू, साळी किंवा तांदूळ दान करावे. भूमीशयन करणाराने चादरीसह गादी दान द्यावी. पत्रावळीवर जेवण्याचा नियम असेल तर ब्राह्मणाला जेवण द्यावे. त्यात तूप, साखर असावी. मौन भोजन करणाराने तीळ, सोने व घंटा दान करून घृतयुक्त जेवण ब्राह्मणास देऊन सांगता करावी. नखे व केस न काढण्याचे ज्याचे व्रत असेल त्याने आरसा दान द्यावा. चपला न वापरणाऱ्याने पादत्राणाचे दान द्यावे.
मीठ वर्ज्य केले असेल तर चांगल्या फळांचे रस द्यावे. दीप अर्पण करणाराने मासान्ती पात्र व दिवा ब्राह्मणास द्यावा. ताम्रपात्रात दिवा ठेवावा. त्यात सोन्याची तार वात म्हणून घालावी. तो दिवा दान करावा. एकान्तर उपवास करणाऱ्याने वस्त्र व सुवर्ण यांसह आठ कुंभ अर्पण करावे. ते मातीचे अथवा चांगल्या धातूचे किंवा सोन्याचे असावेत (शक्तीप्रमाणे). ज्यांना 'सांगता' करणे शक्य नसेल त्यांनी एका ब्राह्मणास जेवायला द्यावे व नियमाची सांगता झाल्याचा आशीर्वाद त्याने द्यावा. त्याला दक्षिणा द्रव्य यथाशक्ती अर्पण करणे आवश्यक आहे. अधिकमासाचे व्रत करणारा महापुण्यवान होऊन गोलकात निवास करतो.
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-२७ समाप्त ||