अधिकमास माहात्म्य अध्याय २८ सुमति राजाची कथा. वाल्मिकींचे निर्गमन
अधिकमासाचे माहात्म्य सांगताना वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला विष्णू-लक्ष्मी संवादाचा वृत्तांत सांगत होते. विष्णू लक्ष्मीला म्हणाला - " अधिक मासाचे व्रत किती प्रभावी आहे ते एका कथेवरून तुला चांगले समजेल. कृतयुगातील गोष्ट आहे. पूर्वी सोमवंशात एक राजा होता. तो शूर होता. त्याची पत्नी सुष्ठुमती. राजा सदाचारसंपन्न होता. त्याचे नाव सुमति व त्याची मतीही चांगली होती. ते दांपत्य त्यांच्या प्रजाहित कार्यासाठी सर्वत्र विख्यात होते. राजा श्रीहरीचा परमभक्त होता. ते दांपत्य दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासात उत्तम व्रते करून दानधर्म भरपूर करीत असे. आंगिरस ऋषी आपल्या शिष्यगणांसह एकदा त्या राजाला भेटण्यासाठी आले. त्यांना पाहून राजाराणी तत्परतेने त्यांच्या स्वागताला सामोरे आले. त्या दोघांनी त्या ऋषींची स्तुती केली. सन्मान केला. नंतर येण्याचा हेतू विचारला. कोणते कार्य करू ? काय आज्ञा आहे ? अशी पृच्छा केली. त्यावेळी राजा काय म्हणाला ऐक.
" हे मुनिवर्या ! तुमचे येणे माझ्या राजसदनात झाले त्यामुळे मी कृतार्थ झालो. सज्जनांचे आगमन सुखप्रदतच असते. जेथे संतांबद्दलचे प्रेम असते तेथे सर्व संपदा येतात. सत्कीर्ती वाढते. दुर्बुद्धी नष्ट होते. जे सत्यधर्माने वागतात त्यांच्यावर संत दया करतात. त्यांच्याइतके दयाळू या जगात कोणीच नाहीत. संत चरणांचे उदक जे मस्तकी धरतात त्यांनी जगातील सर्व तीर्थांचे स्नान केल्यासारखेच आहे. आपण असे श्रेष्ठ संत माझ्याकडे आलात त्यामुळे मी फार धन्य झालो आहे. माझी पत्नी, पुत्र, सारे वैभव व माझा देह आपल्या कोणत्याही कार्यासाठी मी आपल्याला अर्पण करीत आहे. आपल्या आगमनाचे प्रयोजन काय आहे हे कळले तर बरे होईल."
त्याचे नम्र बोलणे ऐकून मुनी म्हणाले - " तुझे नम्र वचन ऐकून मला आनंद झाला. विनय हा असा गुण आहे की त्याच्या योगाने सर्व पुरुषार्थ पूर्ण होतात. मी तुला असा आशीर्वाद देतो की तुझे नित्य कल्याण होवो. राजा, मी तुला एक प्रश्न विचारतो. तुमचे दोघांचे सदाचरण पाहून मला फार बरे वाटले. एक शंका मनात येते. तुम्हाला एवढे वैभव कसे प्राप्त झाले ? तुमची बुद्धी धर्म व सत्य यात स्थिर आहे हे कशामुळे झाले आहे ?" सुमति म्हणाला - " आम्हाला पूर्वजन्माचे स्मरण आहे. मी गेल्या जन्मी वीर नावाचा वैश्य होतो. त्यावेळी मी अनेक पापे केली. मी लोकांचे, ब्राह्मणांचे द्रव्य हरण केले. लोकांना फसविले. अनेक स्त्रिया भोगल्या. सज्जनांची निंदा केली. मी अनेक हिंसाचार केले. पुढे मी निर्धन झालो. लोकांनी माझा तिरस्कार केला. मी वनात गेलो. जो प्राणी मिळेल त्याला मारून मी त्याचे मांस खाई. मला तेही मिळेना. मी थकलो. तहानभुकेने फार व्यथित झालो. वनात फिरत असता मला एक विष्णूमंदिर दिसले. ते फार सुंदर होते. त्याच्याजवळ एक स्वच्छ पाण्याचा तलाव होता. त्यात राजहंस विहार करीत होते. मी पुढे जाऊन ते स्वच्छ पाणी प्राशन केले.
मी तेथे संचित होऊन बसलो असता, माझी भार्या कुलीना ही पण परागंदा झालेली त्या वनात भटकत तेथेच पोहोचली.ही राणी सुष्ठुमतीच त्यावेळी कुलीना म्हणून माझी पत्नी होती. तिला पाहून मला दया आली. मी काही फळे आणून तिला खायला दिली. ती व मी बसून राहिलो. वनातील प्राण्यांना मारून मी खात असे हे समजून तिला फार वाईट वाटले. तिने विचारले - " स्वामी ! एवढी दुर्दशा झाली तरी आपण अजून पापाचरण का करता ? यामुळे अत्यंत क्लेशकारक अशा नरकात पडावे लागेल हे माहित आहे ना ? तरी अजून हिंसाचार करता ? ज्ञान प्राप्त करा. सदाचरण करा. आपण शुद्ध केवल ब्रह्मरूप आहोत याचे भान ठेवा. ज्या भगवान श्रीकृष्णाचे नाव घेताच सर्व पापे नष्ट होतात, त्या श्रीकृष्णाचे नाम घ्या. मंदिरात जे विष्णूभक्त येतील त्यांची सेवा करा. मंदिर स्वच्छ करण्याचेही काम पुण्यप्रद आहे. भक्तीमार्गाने तुम्ही पापमुक्त व्हाल. या विषयी मी पुष्कळ ऐकले आहे." तिने मला चांगला उपदेश केला. मी भक्ती करू लागलो. विष्णूभक्तांचे देवळात आगमन होई त्यावेळी त्यांची सेवा करू लागलो.
अधिकमास आला तेव्हा आम्ही दोघांनी यथाशक्य व्रताचरण केले. त्यामुळे माझी सर्व पापे नाश पावली. तो जन्म संपला व हा जो जन्म लाभला त्यात आम्हाला सर्व वैभव प्राप्त झाले, सद्गुण प्राप्त झाले. पुण्यकृत्ये घडू लागली. पूर्वजन्माचे स्मरणही कायम राहिले. अधिकमास व्रताचे हे फळ आहे." आंगिरस मुनींना सर्व इतिहास ऐकून फार आनंद झाला. विष्णू म्हणाला - "आंगिरस मुनींनी राजाला उत्तम आशीर्वाद दिला व राजाने केलेला पाहुणचार स्वीकारून ते शिष्यांसह आपल्या आश्रमात निघून गेले. सुमति व सुष्ठुमती नित्य हरिभक्ति करीत राहिले व देहांत झाल्यावर गोलकात त्यांना स्थान मिळाले." नारायण नारदाला म्हणाले - "दृढधन्वा व त्याची राणी गुणसुंदरी विरक्त होऊन आपल्या ज्येष्ठ पुत्रास समारंभपूर्वक राज्यपदी बसवून हरिभक्तीसाठी अरण्यात निघून गेले."
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-२८ समाप्त ||