अधिकमास माहात्म्य
अध्याय २२
स्नान-माहात्म्य
विष्णू म्हणाला - "अधिकमासातील स्नानाचे महत्त्व फार आहे. मी किती वर्णन करू असे मला झाले आहे. त्यासंबंधीच्या कथाच मी तुला सांगतो. सातशे प्रेते स्नानाच्या पुण्याने मुक्त कशी झाली त्याची पुरातन गोष्ट ऐक. गोकर्ण पर्वताजवळ शिवपुरी नामक एक नगर आहे. ते शंकराचे आवडते नगर मोठे प्रशस्त आहेत. चौक, मार्ग, उंच महाल, मंदिरे, उपवने यांनी सुशोभित अशा त्या नगरात आपापले स्वधर्म कर्म आचरण करणारे नागरिक भक्तीपूर्वक राहत होते. मंदिरातून भजने कीर्तने, विद्वानांच्या सभेत शास्त्रचर्चा, नगरात समाजोपयोगी कार्ये सतत चालत असत. तेथे विप्रदास नामक एक सदाचार संपन्न शूद्र राहत असे. त्याची पत्नी पतिव्रता होती. कालांतराने अधिकमास आला. त्या दोघांनी अधिकमासात स्नान व दान करण्याचे व्रत विधिवत स्वीकारले. गोकर्ण पर्वताच्या पायथ्याशी सारणेश्वर नावाचे शिवमंदिर होते. तेथे गोकर्णी नावाच्या नदीचा प्रवाह आहे. तेथे ती दोघे रोज स्नाने करू लागली. सारणेश्वराचे दर्शन व पूजन करावे असा त्यांचा नित्यक्रम असे. त्यांनी प्रतिदिनी विप्रांना वस्त्रे व द्रव्य दान देण्यास प्रारंभ केला. "आपण स्वतः गरीब आहोत व तुम्ही स्वल्प संतुष्ट आहात. दाने स्वीकारून आपण माझ्यावर उपकार केले आहेत. मी तुम्हाला जो काही त्रास दिला असेल त्याबद्दल मला क्षमा करा." अशी विप्रांची प्रार्थना करून विप्रदास पत्नीसह मासान्ती व्रतसमाप्ती करून स्वगृही आला. पण मार्गात त्याला ७०० प्रेतात्मे भेटले. ते कितीतरी भयंकर होते. त्यांच्या विद्रुपतेचे वर्णनच करू नये असे मला वाटते. विप्रदासाच्या पत्नीला फार भय वाटले. पण विप्रदास शांत व धीट होता. त्याने त्या भूतांची सर्व कहाणी विचारली. ती भुते विप्रदासाच्या दर्शनाने थोडीफार सुखी झाली होती. त्यांनी आपल्या पूर्वजन्मातील केलेल्या अनेक पापांची माहिती सांगितली व सध्याचे हाल सांगितले. त्यांनी विप्रदासाला आपला उद्धार करण्याची प्रार्थना केली. विप्रदासाला दया आली. त्याने अधिकमासात जी स्नाने केली होती त्या स्नानांचे सात दिवसांचे पुण्य त्या ७०० भुतांच्या उद्धारार्थ दिले. त्यावेळी ते सर्व जीव प्रेतयोनीतून मुक्त होऊन दिव्य देह धारण करून विमानातून स्वर्गात गेले."
विष्णू म्हणाला - " आणखी एक गोष्ट अशी आहे की प्रभास नामक पुण्यस्थान सौराष्ट्रात आहे. तेथे सोमशर्मा नावाचा विप्र रहात होता. तो सदगुणी, भक्तीमार्गी, विद्वान व उदार मनाचा होता. त्याने जप, तप, यज्ञ आदी अनेक धार्मिक कार्ये केली होती. नाना तीर्थयात्रा व स्नाने केली होती. तो एकदा सिंधू-सरस्वती संगमावर पत्नीसह स्नानासाठी जात असतात एक पर्वतप्राय शरीराचा भयंकर राक्षस समोर उभा राहिला. त्याला पाहून प्रथम सोमशर्मा दचकला. तो राक्षस सोमशर्माच्या अंगावर धावून आला. पण तेवढ्यात सोमशर्मा नृसिंहांचे स्मरण करून स्थिर उभा राहिला. त्यावेळी त्या तपस्वी सोम शर्माच्या दिव्य तेजस्वी दर्शनाने राक्षसाचे मन एकदम पालटले. त्याने एकदम सोमशर्माला शरण जाऊन त्याची स्तुती केली व स्वतःची दुःखप्रद स्थिती सांगून उद्धार करण्याची नम्रपणे प्रार्थना केली. सोमशर्मा मनाशी म्हणाला - 'या राक्षसाचा उद्धार केला तर पुढील काळात त्याच्या हातून होणारे संहार थांबतील.' त्याने हातात उदक घेतले व आपण जी अधिकमासात स्नाने केली त्यातील एका स्नानाचे पुण्य त्या राक्षसाला अर्पण केले. तो राक्षस तत्काळ विक्राळ रूप टाकून दिव्य शरीरी झाला. त्याने सोमशर्माची पुष्कळ स्तुती केली. विमान आले त्यात बसून तो गगनात गेला. त्याला स्वर्गात स्थान मिळाले. अनेक देव त्याला नेण्यासाठी आले होते."
एवढी कथा सांगून विष्णू म्हणाला - "इंदिरे ! अधिकमासातील स्नानाचे असे माहात्म्य आहे. त्याचे पुण्य दुसऱ्यांना देता येते व पतीतांचा उद्धार करता येतो." पुढच्या अध्यायात एकांतर उपवासाचा महिमा सांगितला जाईल. (वाल्मिकी दृढधन्वा राजाला विष्णू-लक्ष्मी संवाद सांगत होते.)
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-२२ समाप्त ||
