अधिकमास माहात्म्य अध्याय ३०
कदर्याला पिशाच्च योनीत जन्म व वानरजन्मात जाऊन त्याचा उद्धार
यम म्हणाला - " चित्रगुप्ता ! हा कोण जिवात्मा येथे आणला आहे ? त्याचे पाप पुण्य काय आहे ?" चित्रगुप्त म्हणाला - "स्वामी ! हा एक अधम ब्राह्मण आहे. याचे नाव चित्रशर्मा आहे. पण हा कद्रू होता म्हणून याला कदर्य असे म्हणत असत. याचे कोणतेही पुण्य नाही. याने एका माळ्याच्या बागेत राहून सतत पापेच केली आहेत. याने बागेतील फळे खाल्ली. तसेच पुष्कळ फळे विकून पैसे मिळवले व ते द्रव्य जमिनीत पुरून ठेवले. विश्वासघात व धनलोभाने चोरी करणे ही याची मुख्य पापे. चित्रगुप्ताने यमाला सर्व सांगितले. यमाने त्याला आधी घोर प्रेत योनीत टाकण्याची, नंतर वानर योनीत जन्माला घालण्याची व त्यानंतर नरकात टाकण्याची शिक्षा दिली. त्याप्रमाणे यमुदूतांनी त्याला प्रेतयोनीत टाकले. भूक व तहान यांनी अत्यंत हैराण होऊन तो घोर वनात इकडे तिकडे भटकू लागला. तो तडफडे, भूमीवर पडे, पुन्हा उठे, धावे, पुन्हा पडे - भुकेने अत्यंत व्याकुळ झालेला ! भयंकर कुचंबना झालेली ! असे दुःख त्याने पुष्कळ काळ सोसले. मग यमुदूतांनी त्याला वानरयोनीत टाकले. योगायोगाने तो कालंजर पर्वतावर जन्माला आला.
तेथे गोड शीतल पाणी होते. वृक्षांवर अनेक फुले फळे होती. तेथे इंद्राने निर्मिलेले सरोवराएवढे एक कुंड होते. त्याला पापनाशक कुंड असे नाव होते. तेथे एक मृगतीर्थ नामक तीर्थ आहे. तेथे श्राद्ध केल्यास पितरांचा उद्धार होतो अशी त्याची ख्याती आहे. दैत्यांच्या भयाने देवांनी मृगरूप धारण करून तेथे स्नान केले. त्यामुळे ते निर्मळ झाले व पुन्हा आपापल्या स्वर्ग स्थानास प्राप्त झाले. म्हणून त्याला मृगतीर्थ असे नाव पडले." नारदाने विचारले - " कदर्य पापी असून त्याला मृगतीर्थाजवळ जन्म का मिळाला ?" नारायण म्हणाला - "त्याचे कारण सांगतो ऐक. चित्रकुंडल नावाचा एक श्रीमंत वैश्य होता. तारका नावाची त्याची पत्नी होती. त्या दोघांनी अधिकमासाचे व्रत केले होते. अमावस्येच्या उद्यापणाचा दिवस होता. त्यांनी पूजा प्रारंभ केली होती. कदर्य ब्राह्मण, आपल्याला काहीतरी दक्षिणा मिळेल या आशेने तेथे गेला व अधिकमास व्रताची आणि पूजेची त्याने खूप प्रशंसा केली. धनलोभाने का असेना, त्याच्या भाग्याने त्याला पुरुषोत्तमाची पूजा पहायला मिळाली, व्रताची स्तुतीही घडली. त्या वैश्याने इतर ब्राह्मणांना दक्षिणा दिली पण कदर्याला दिली नव्हती. तो लोचटपणे तेथेच उभा राहिला व त्या चित्रकुंडलाची, त्याच्या व्रताची खूप प्रशंसा करू लागला. त्याने हे जे केले ते पुण्यकर्मच झाले. त्याचे फल म्हणून वानरयोनीत मृगतीर्थाजवळ त्याला राहायला मिळाले.
" नारद म्हणाला - " त्याची पापे मोठी असूनही त्याला फळे व मधुर जल आहे अशा ठिकाणी जन्म का मिळाला ?" नारायण म्हणाला - " त्यासंबंधीचा इतिहास सांगतो. रामरावणांच्या युद्धात रावणाचा वध झाला व राक्षसांचा संहार झाला. तसेच लक्षावधी वानरही मरण पावले होते. रावण वध करून रामाने देवतांना बंदीतून सोडवले म्हणून सर्व देवांनी रामाची फार प्रशंसा केली. त्यावेळी रामाने इंद्राला म्हटले - जे वानर या युद्धात मरण पावले आहेत त्यांना अमृत सिंचन करून पुन्हा जिवंत करावे. इंद्राने वानरांना जिवंत केले. रामाने सुग्रीवादिकांना व वानरांना असा वर दिला की पृथ्वीवर वानर जेथे जेथे राहतील तेथे त्यांना भुकेची बाधा होऊ नये व तहानेचा त्रास होऊ नये. तेथे विपुल वृक्ष व फळे आणि शितल पाणी उपलब्ध असेल." रामाच्या या वरदानामुळे वानर म्हणून कदर्याचा जो जन्म झाला तो त्या रमणीय पर्वतावर व सरोवराजवळ झाला. पुढे काय झाले ते ऐक. त्या वानराला पित्तामुळे तोंडात फोड आले होते. हा पूर्वकर्माचाच परिणाम. फळे असूनही त्याला ती खाता येत नव्हती. तो अशक्त झाला. वानरांना स्वाभाविक म्हणजे या वृक्षावरून त्या वृक्षावर उड्या मारणे. पण तो अशक्त असल्यामुळे तशी उडी मारताना तो खाली पडला. त्याची हाडे मोडली. त्याला जागचे हलताही येईना. त्याचे दात पडले. थंडी व वारा यांचा त्याला खूप त्रास झाला. उपासही पडला.
तो जो वरून पडला तो त्या कुंडात पडला. त्याला कुंडाबाहेर येता येईना. चार दिवस तो उपाशी, शीतबाधित, दात दुखत आहेत, हाडे मोडली आहेत अशा स्थितीत पडून राहिला. पाचव्या दिवशी तो मरण पावला. ते पाच दिवस अधिकमासाच्या कृष्ण पक्षातील शेवटचे पाच दिवस होते. त्याचे नकळत त्याच्या हातून स्नानही घडले. त्यामुळे स्नान, उपवास आदि व्रताचरणच झाले. परिणाम असा झाला की त्याचा वानर देह जाऊन तो दिव्य देही झाला. तेवढ्यात तेथे दिव्य विमान आले आणि अनेक अलंकार त्याच्या दिव्य शरीरावर शोभत आहेत असा तो त्या विमानात आरुढ झाला."
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-३० समाप्त ||