अधिकमास माहात्म्य अध्याय ३१
कदर्याचे गोलोकगमन - अधिकमासाची महती
नारायण नारदाला म्हणाला - "त्या वानराला त्या कुंडातील पाण्यात आगतिकपणे पडून राहिल्यामुळे अधिकमासात पाच दिवस स्नाने घडली. त्याचा प्रभाव असा पडला की त्याचा कपिदेह जाऊन त्याला दिव्य देह प्राप्त झाला व स्वर्गातून त्याच्यासाठी विमान आले. त्या विमानात अनेक वैष्णव बसले होते. कर्णमधुर वाद्ये वाजत होती. गंधर्व सुस्वर गायन करीत होते. किन्नरही गात होते. अप्सरा नृत्ये करीत होत्या. सोन्याच्या छोट्या घंटिका किणकिण वाजत होत्या. ते दिव्य विमान पाहून तो अंतरंगात मोठे आश्चर्य करू लागला. 'मला पाप्याला नेण्यासाठी हे विमान का बरे आले ? पुण्यवंतालाच हे योग्य आहे. माझी योग्यताच नाही.' तेवढ्यात एक अप्सरा पुढे आली व तिने त्याच्या मस्तकावर श्वेत छत्र धरले. दोन अप्सरा येऊन चवऱ्यांनी वारा घालू लागल्या. काही स्त्रिया विमानातून उतरून त्याच्या स्वागतार्थ गायन व नर्तन करू लागल्या. एक तांबूल घेऊन उभी राहिली. एक सोन्याच्या झारीत गंगाजल घेऊन आली. ते सर्व पाहून तो दिव्य शरीरी कदर्य चित्रवत स्तब्ध राहिला. तो मनाशी म्हणाला - 'मी कोणतेही पुण्य केले नाही, तरी ही सुखे मला कशी काय प्राप्त झाली ?' त्याचे विचार ओळखून देवदूत सुशील व पुण्यशील त्याला म्हणाले - "प्रभो ! आपण गोलोकात चलावे. इथे विचार करण्यात वेळ कशाला घालविता ? पुरुषोत्तम श्रीकृष्णाचे सान्निध्य तुम्हाला लाभले आहे.
" कदर्य म्हणाला - "माझी कितीतरी पापे झाली आहेत. कोणत्या पुण्यामुळे त्या पापांचा विनाश झाला ? गवताचे असंख्य अंकुर, आकाशातील असंख्य तारे, मातीचे असंख्य कण - तशी माझी असंख्य पापे झाली असतील. तरी माझ्यासाठी हे विमान कसे आले ?" त्यावर ते हरिदूत म्हणाले - "तुमच्याकडून काय पुण्य झाले आहे ते तुमच्या लक्षात आले नसावे. सर्व महिन्यात अधिकमास हा पुरुषोत्तमाचा अत्यंत प्रिय मास आहे. त्या मासात तू वानर देहाने अवचित अत्यंत कठीण व्रत केलेस. ते म्हणजे तू इकडे तिकडे फिरत असताना तोंडात फोड झालेले असल्यामुळे तू काहीच खाऊ शकला नाहीस. त्यामुळे तुला उपवास घडला. निराहार घडला. तू फळे तोडलीस खरी पण ती तुला खाता येत नसल्यामुळे झाडावरून खाली टाकलीस. ती खाऊन इतर पशु पक्षी समाधान पावले. तुजकरून अन्नदानच झाले. तू दुःखामुळे पाणीसुद्धा प्यायला नाहीस. शीत सहन केलेस. वारा सहन केलास. उन्हात तप्त झालास. असे तप तुझ्या हातून घडले. मृगतीर्थात तू पडलास. तुझी हाडे मोडली. तुला त्या पाण्यातून बाहेर येता येईना त्यामुळे तुला पाच दिवस थंड पाण्याचे व तेही पापनाशक तीर्थात स्नान घडले. रुग्णावस्थेत, अजाणता तुजकडून फार तीव्र तप झाले. अधिकमासात झालेल्या या तपाने तुझी सर्व पापे धुतली गेली." हरिदूतांनी असे त्याला सांगितले तेव्हा तो हर्षित झाला, आनंदाने रडू लागला. त्याने कालंजर पर्वत, ते सरोवर, ते कुंड, सर्व वृक्ष वेली व पशुपक्षी यांना वारंवार नमस्कार केला.
त्याने त्या दिव्य विमानाला प्रदक्षिणा घातली. गंधर्व, अप्सरा, किन्नर यांचे नृत्यगायनास भर आला. विमानात तो आरुढ झाला. हरिदूतांसह ते विमान गोलोकात गेले. तेथे गोधन विपुल होते. रासमंडळ होते. मृत्यू व आपत्ती, रोग व चिंता, दुःख व मानसिक चिंता यांचा तेथे पूर्ण अभाव होता. विमानातून तो गोलोकात उतरला तेव्हा श्रीकृष्णाचे त्याला दर्शन घडले. तो श्रीकृष्णाच्या सन्निध सुखाने राहू लागला. नारदा ! पाहिलेस ना अधिकमासातील तपाचे अलौकिक फळ !" सूत शौनकादि ऋषींना म्हणाला - "नारायणाने अधिक मासाचे जे माहात्म्य सांगितले ते ऐकून नारदाचे समाधान झाले. त्याने कलियुगातील संसारातील व दुःखांनी त्रस्त झालेल्या लोकांचे कल्याण घडण्यास सोपा उपाय कोणता असा प्रश्न विष्णूला विचारला होता, त्यावर नारायणाने अधिकमासाचे माहात्म्य अनेक कथांच्या आधारे सांगितले. त्यामुळे नारदाला लोककल्याणाचा उपाय कळला व तो सत्यलोकी निघून गेला. ऋषिजनहो ! या ग्रंथाचे पारायण अधिक मास येण्यापूर्वीच करावे व व्रतसाधना समजून घेऊन तशी करून आपले परम कल्याण साधावे."
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-३१ समाप्त || || पद्मपुराण व बृहन्नारदीय पुराणांतर्गत अधिक मास माहात्म्य समाप्त ||